राज्यात मागील आठवड्यात दुसरा मोठा राजकीय भूकंप झाला. यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरीनंतर उभी फूट प़डली आहे. अजित पवारांनी शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. यामुळे राज्यातील सत्तासमीकरणं बदलली असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे.याचवेळी विधानसभा अध्यक्षांनी शिंदे गटातील ४० आमदारांना आपलं म्हणणं मांडण्यासाठी नोटीस पाठवली आहेत. याचवेळी राजकीय वर्तुळात तर्क वितर्कांना उधाण आलं असतानाच माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठं विधान केल्यामउळे एकच खळबळ उडाली आहे.
काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अजित पवारांच्या बंडावर भाष्य केलं. अजित पवार सत्तेत आल्याने भाजपसाठी एकनाथ शिंदे यांची उपयुक्तता संपलेली आहे. तसेच अजित पवारांना भाजप मुख्यमंत्री करणार असे धक्कादायक दावे पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे. अजित पवार यांची सत्तेत एन्ट्री झाल्याने एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्या मुख्यमंत्रीपदाला धोका निर्माण झाल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
पृथ्वीराज चव्हाण नेमकं काय म्हणाले…?
पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादीतील बंडखोरीवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. चव्हाण म्हणाले, अजित पवारांनी या आधीही भाजपसोबत जात पहाटे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. मात्र,शरद पवार यांना अजित पवारांची मनधरणी करण्यात यश आल्याने ते आल्या पावली परत गेले होते. आता चित्र वेगळे आहे. छगन भुजबळ आणि प्रफुल्ल पटेल यांसारख्या बड्या नेत्यांनी त्यांच्या भूमिकेला खंबीर पाठिंबा दिल्याने अजित पवार यांचं पारडं जड असल्याचं चित्र आहे. तर दुसरीकडे खुद्द शरद पवार हे मैदानात उतरल्याने मतदारांचे मन वळवण्याचा त्यांचा प्रयत्न दिसत असल्याचंही चव्हाण यावेळी म्हणाले आहे.
…तेव्हापासून पवारांना माझ्याबद्दल गैरसमज !
आघाडीच्या काळात मी मुख्यमंत्री झाल्यापासून शरद पवारां ना माझ्याबद्दल गैरसमज आहे. तसेच राष्ट्रवादीला संपवण्यासाठी सोनिया गांधींनी मला महाराष्ट्रात पाठवलं हा पवारांचा गैरसमज असल्याचंही चव्हाण यावेळी म्हणाले. कट्टर काँग्रेसवादी असलेले पृथ्वीराज चव्हाण यांनी आणखी एक मोठा दावा केलेला आहे. नितीन गडकरी आणि संघाचा अजित पवारांच्या सरकारमधील समावेशाला विरोध असल्याचं पृथ्वीराज चव्हण म्हणाले.