• Fri. Jun 27th, 2025

मुश्रीफ भाजपच्या वळचणीला तर गेले पण फडणवीसांचा चेला म्हणतो, २०२४ ला बरोबर कार्यक्रम करतो!

Byjantaadmin

Jul 6, 2023

कोल्हापूर : अजित पवार गटाचे आमदार हसन मुश्रीफ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर नाराज असणारे भाजप कोल्हापूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे यांनी भाजपमध्येच राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. इतकंच नव्हे तर ऑक्टोबर २०२४ मध्ये होवू घेतलेल्या विधानसभा निवडणुकीत कागल विधानसभा मतदारसंघातून रेकॉर्ड ब्रेक मार्जिनने विजयी होणार असल्याचा दावा करत जो काय कार्यक्रम करायचा तो मी आणि देवेंद्र फडणवीस बघून घेऊ, असंही ते यावेळी म्हणाले. समरजीत घाटगे यांच्या या दाव्यानंतर राज्यात पहिल्यांदाच भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये मतदारसंघाच्या दाव्यावरून वादाची ठिणगी पडली आहे

Kolahpur News Maharashtra Politics

२०२४ च्या विधानसभेच्या निवडणुकीत आपणच उमेदवार असणार

रविवारी राज्यात पार पडलेल्या राजकीय घडामोडीनंतर राज्यात आता भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अशी सत्ता स्थापन झाली आहे. यामुळे स्थानिक राजकारणावर देखील मोठा परिणाम झाला असून कट्टर विरोधक असलेले आता सत्तेत आल्याने अनेकांची अडचण झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यात देखील अशीच अडचण निर्माण झाले असून येथील दोन पारंपरिक कट्टर विरोधक असणारे मुश्रीफ-घाटगे यांच्यात येत्या काळात मोठा वाद निर्माण होणार आहे.

अजित पवार यांच्यासोबत हसन मुश्रीफ यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतलीये. यानंतर भाजप ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे हे नाराज झाले आहेत. गेल्या तीन ते चार दिवसांपासून ते संपर्क क्षेत्राच्या बाहेर देखील होते. त्यांची मुंबई येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली आणि त्यांनी समरजीत राजेंना तुम्ही तुमची तयारी सुरू ठेवा, असा शब्द दिल्याने त्यांनी आज कागल येथे कार्यकर्ता मेळावा घेत २०२४ च्या विधानसभेच्या निवडणुकीत आपणच उमेदवार असून मोठ्या मताधिक्याने आपण निवडून येऊ, असा दावा केला.

कार्यक्रम कसा करायचा हे मी आणि देवेंद्र फडणवीस बघून घेऊ

तर समरजीत घाटगे यांनी पुढे बोलताना म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात भाजपच्या प्रत्येकासाठी राष्ट्र प्रथम आणि व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा यामुळे माझे राजकीय गुरू असणारे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदावरून उपमुख्यमंत्री पद स्वीकारू शकतात आणि चंद्रकांत दादा पाटील कोल्हापुरातून पुण्यात जाऊन निवडणूक लढवू शकतात, तर मी का नाराज होऊ? असा मुद्दा मांडत कार्यकर्त्यांना ऑक्टोबरमध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी कामाला लागा असा सल्ला दिला आहे. तसेच काही जरी झाले तरी त्यांचा कार्यक्रम कसा करायचा हे मी आणि देवेंद्र फडणवीस बघून घेऊ असे म्हणत आपल्या विजयाचा निर्धार यानिमित्ताने त्यांनी केला.

गुरुला सोडणार नाही असं म्हणणाऱ्यांनी आता गुरूच बदलला

कोणी मुख्यमंत्री तरी झाला तरी मला फरक पडत नाही असे म्हणत मुश्रीफ हे मंत्री झाल्याने आपल्याला काहीही वाटत नाही. आपण भाजप खुर्द (ओरिजनल) आहोत. आताच आलेल्या भाजप बुद्रुकसाठी म्हणजेच राष्ट्रवादीमधून हसन मुश्रीफ भाजप सोबत आल्याने आपण पार्टी सोडायचा प्रश्नच येत नाही. यामुळे पक्षनिष्ठा काय असते, आता ते मी दाखवतो. तर इथे हसन मुश्रीफ यांनी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत गुरुला सोडणार नाही असे म्हणणाऱ्यांनी गुरूच बदलला असे म्हणत हसन मुश्रीफ यांना राजेंनी टोला लगावला आहे. तसेच पुरोगामीचे सर्टिफिकेट घेऊन फिरणारे अखेर आमच्या सोबत आलेच आणि त्यांना आमचा प्रचारही करावा लागणार आहे, असेही ते यावेळी म्हणाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *