राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह आठ आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळं सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाल्याचं चित्र आहे. राष्ट्रवादीच्या आमदारांना मंत्री करण्यात आल्याने शिंदे गटाचे आमदार भारत गोगावले आणि संजय शिरसाट यांनी नाराजी व्यक्त केली आहे. याशिवाय ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार अपात्र ठरल्यास अन्य आमदारांचं काय होणार?, असा प्रश्न अनेकांना पडलेला असतानाच आता आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे. भाजपाचे बडे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी राज्यात आणखी मोठा भूकंप होणार असल्याचा दावा केला आहे.भाजपाचे माजी खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्वीट करत शिंदे गटाचे अनेक आमदार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा मोठा गौप्यस्फोट केला आहे. ट्वीटमध्ये बोलताना सुब्रमण्यम स्वामींनी म्हटलंय की, मी सध्या मुंबईत आहे, शिंदे गटातील अनेक आमदार शिवसेनेत परतण्याची शक्यता आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिंदे गटाचा वापर करून घेतल्यानंतर आता राष्ट्रवादीला सोबत घेतलं आहे. याच गोष्टीमुळं एकनाथ शिंदेंचे आमदार प्रचंड अस्वस्थ असल्याचं मला समजलं आहे. त्यामुळं आता भाजपच्याच नेत्याने केलेल्या वक्तव्याने सत्ताधारी गटात खळबळ उडाली आहे. रात्री उशीरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार-खासदारांची बैठक घेतली आहे. त्यात मंत्रिमंडळ विस्तार आणि भाजपच्या भूमिकेवर चर्चा झाल्याची माहिती आहे.
I am Mumbai and I hear the Shiv Sena rebels may return to Uddhav Thakre , because of disgust at Modi wooing NCP and sidelining them after using them earlier
— Subramanian Swamy (@Swamy39) July 5, 2023
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील ४० आमदारांसह बंड करत भाजपसोबत सत्ता स्थापन केली होती. सत्तांतराला एक वर्ष पूर्ण होत असतानाच आता भाजपने राष्ट्रवादीतील नऊ आमदारांना थेट मंत्रीपदाची शपथ दिली आहे. त्यामुळं शिंदे गटाच्या आमदारांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. याशिवाय येत्या ११ ऑगस्टपूर्वी एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रतेवरील निर्णय विधानसभा अध्यक्षांकडून घेतला जाणार आहे. त्यामुळं बंडखोर आमदार अपात्र ठरल्यास शिंदे-फडणवीस सरकार कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळंच भाजपने राष्ट्रवादीतील आमदारांना सत्तेत सामावून घेतल्याचं बोललं जात आहे.