मुंबई : मंत्रिपदासाठी वर्षभरापासून सुरू असलेली प्रतीक्षा आणि त्यातच अजित पवार गटाच्या नऊ जणांचा अचानक मंत्रिमंडळात समावेश झाल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील आमदारांमधील अस्वस्थता शिगेला पोहोचली आहे. याच मुद्दय़ावरून दोन आमदारांत मंगळवारी सायंकाळी बाचाबाची आणि झटापट झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. आमदारांमधील भांडणाचे वृत्त समजताच नागपूर दौरा अर्ध्यावर सोडून मुख्यमंत्री मुंबईत परतले. त्यांच्या उपस्थितीत ‘वर्षां’ बंगल्यावर आमदारांची समजूत काढण्याचे प्रयत्न बुधवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह नऊ जणांच्या मंत्रिमंडळ समावेशाने शिंदे गटात कमालीची नाराजी आहे. जुलै महिन्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, अशी आशा असल्याने शिंदे गट आणि भाजपमधील अनेक इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, अचानक सत्तेत तिसरा वाटेकरी आल्याने त्यांच्या अपेक्षांना सुरूंग लागला. नव्या सत्ता समीकरणांनुसार शिंदे गटाच्या वाटय़ाला आणखी जेमतेम तीन ते चार मंत्रिपदे येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे यात आपली वर्णी लागावी यासाठी शिंदे गटातील आमदारांतच चुरस निर्माण झाली आहे. काही आमदारांनी ‘गेले वर्षभर ज्यांना मंत्रिपद उपभोगता आले, त्यांना हटवून इतरांना संधी द्या’ अशी जाहीर मागणी केली आहे. अशातच मंत्रिपदावर दावा करणाऱ्या दोन आमदारांमध्ये मंगळवारी शाब्दिक चकमक झाली. हा वाद इतका टोकाला गेला की उभयंतांमध्ये किरकोळ हाणामारी झाल्याची माहितीही सूत्रांनी दिली.
आमदारांतील भांडणाची माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांना nagpur येथील नियोजित दौरा अर्ध्यावर सोडून मुंबईत परतावे लागले. विशेष म्हणजे, बुधवारी दिवसभर मुख्यमंत्र्यांनी एकही कार्यक्रम आखला नव्हता. दिवसभर आपल्या गटातील महत्वाच्या नेत्यांशी बैठका तसेच राजकीय खलबतांमध्ये ते व्यग्र होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. सायंकाळी उशिरा पक्षाच्या आमदार, खासदारांची बैठक त्यांनी घेतली. या बैठकीत त्यांनी आमदारांची समजूत काढण्याचा तसेच धीर धरण्याचा सल्ला दिल्याचे सांगण्यात येते.
दरम्यान, शिंदे गटात अस्वस्थता असल्याच्या वृत्ताचा प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी इन्कार केला. आमदार नाराज असल्याची अफवा पसरविण्यात येत असली तरी सर्व व्यवस्थित सुरू आहे. राष्ट्रवादीच्या सहभागामुळे युती भक्कम झाली आहे, असा दावा म्हस्के यांनी केला.
मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
अजित पवार यांच्या मंत्रिमंडळ समावेशामुळे अस्वस्थ झालेल्या शिंदे गटाच्या आमदारांनी सोमवारी, गुरुपौर्णिमेच्या दिवशी ठाण्यात मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर सोमवारी सायंकाळी शिवाजी पार्क येथे पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी येत्या काही दिवसांत मंत्रिमंडळाचा पुढील विस्तार होईल, असे स्पष्ट केले होते. त्यानंतर या विस्तारात स्थान मिळवण्यासाठी शिंदे गटातील आमदारांत चुरस सुरू झाली. त्यातूनच दोन आमदार एकमेकांना भिडल्याचे समजते. दरम्यान, मंत्रिपदांची संख्या वाढवण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री devendra fadnvis यांच्याशी चर्चा करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी आपल्या आमदारांना दिल्याचे समजते.