• Sat. Jun 28th, 2025

महिलांच्या सर्वांगीन उन्नतीसाठी शासनाचे आश्वासक पाऊल

Byjantaadmin

Jul 4, 2023

महिलांच्या सर्वांगीन उन्नतीसाठी शासनाचे आश्वासक पाऊल

महाराष्ट्र सामाजिक,आर्थिक विकासात नेहमीच  अग्रेसर राहिला आहे.आर्थिक आणि सामाजिक विषमता संपविण्यासाठी प्रयत्नरत असलेल्या आपल्या राज्याने वंचीत घटक, महिला यांच्यासाठी खूप मोठे काम उभे केले आहे. सध्याच्या युती शासनाने महिलांना एस. टी.च्या बसेस मध्ये दिलेली 50 टक्के प्रवासी सवलत असेल वा अंगणवाडी सेविकांच्या मानधना मध्ये वाढ असेल व्वा ज्येष्ठ नागरिकांसाठी बसचा प्रवास मोफत असेल..वा  बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना असेल.. ह्या लोकाभिमुख योजनांची अंमलबजावणी दूरगामी परिणाम करणारी दिसत आहे. या सर्व  योजनांचा लातूर जिल्ह्यात काय परिणाम दिसून येतोय यावर टाकलेला हा प्रकाशझोत…!!

लातूर जिल्ह्याने आरोग्य सेवेत राज्यातच नव्हे तर देशात प्रथम क्रमांक मिळवला..जिल्ह्यातील आयुष्मान भारत योजनेच्या अंतर्गत ‘आरोग्यवर्धिनी’ची अंमलबजावणीची तसेच आरोग्य क्षेत्रातील उपक्रमांची दखल घेवून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दि.21 एप्रिल 2023  रोजी दिल्लीत लातूर जिल्ह्याला राष्ट्रीय स्तरावर गौरविण्यात आले. जिल्ह्यातील 233 आरोग्यवर्धिनी केंद्रामधून

सातत्याने गुणवत्तापूर्ण सेवा दिली जात आहे.त्यात प्रामुख्याने यामध्ये गरोदर माता बालक, किशोरवयीन मुलींच्या आरोग्यविषयीच्या सेवा, संसर्गजन्य व रक्तदाब, मधुमेह, कर्करोग यासारख्या असंसर्गजन्य आजारांवरील उपचार, आपत्कालिनी आरोगय सेवा, कान नाक घसा विषयक,  मानसिक आजारांवरील सेवा, तसेच आरोग्यदायी जीवनशैलीसाठी योगा, आहार, व्यायाम यासारखे विविध उपक्रम यांचा समावेश आहे. समाजाचे आरोग्य उत्तम राहिले तर प्रगतीचे नवे मार्ग निर्माण होतात, याची जाणीव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शासनाला असल्यामुळे “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ” सुरु केला. त्याला लातूर जिल्ह्यात उत्तम प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यातील 10 तालुक्याच्या ठिकाणी हे हॉस्पिटल निर्माण केले असून गोरगरिबांना अगदी रक्त, लघवी तपासणी पासून सर्व सुविधा मोफत असल्यामुळे लोकांचा इकडे वाढता कल आहे. या दवाखान्यामुळे अनेक वर्षे अंगावर काढलेले असंसर्गजन्य रोग कळत आहेत, त्यात प्रामुख्याने उच्च रक्तदाब, थायरॉईड, स्त्रियांमध्ये मोठ्या प्रमाणात एनीमिया आढळून येत आहे. अत्यंत गरीब, मध्यमवर्गीयांसाठी “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” संजीवनी ठरत आहे. सर्वसामान्यांना इथल्या मोफत तपासण्या, सुविधा कळतायत तशी गर्दी वाढत चालली आहे. अशी प्रतिक्रिया चाकूर येथील या दवाखान्यातील डॉ. पूजा सूर्यवंशी आणि रेणापूरच्या डॉ. अर्चना मुचाटे यांनी सांगितले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे हे सातत्याने जिल्ह्यातील सर्व 10 “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” यांच्याशी समन्वय ठेवून असल्यामुळे एक चांगली आरोग्य सुविधा नागरिकांना देता येत असल्याची भावना डॉ. पूजा सूर्यवंशी यांनी बोलून दाखविली.

ग्रामीण आरोग्याचा सेतू आशा स्वयंसेवक

ग्रामीण आरोग्याचा सर्वात मोठा आधार हा अशा स्वयंसेवक आहेत. त्यांच्या सहकार्यामुळे ग्रामीण भागातल्या शेवटच्या रुग्णापर्यंत आरोग्य सेवा पोहचत असते. त्यामुळे आशाचे महत्व अनन्यसाधारण असल्याची भावना जिल्हा आरोग्य अधिकारी एच. व्ही. वडगावे यांनी बोलून दाखविली. लातूर जिल्ह्यात आज घडीला 1743 एवढ्या आशा स्वयंसेवक कार्यरत आहेत. शासनाने 1,500 वाढीव मानधन दिले असल्यामुळे आता एक आशा स्वयंसेवकाला जवळपास 5500 एवढे मानधन मिळत आहे. त्यामुळे त्यांच्या उत्साह अधिक द्विगुणित झाला असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी सांगून आरोग्यवर्धिनीच्या कामाला राष्ट्रीय गौरव प्राप्त झाला त्यातही यांचा वाटा अत्यंत महत्वाचा असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान

लातूर जिल्ह्यात ” माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान” 26 सप्टेंबर 2022 पासून  राबविण्यात आले. या मोहिमेत जिल्ह्यातील 18 वर्षावरील सर्व महिला, माता व गरोदर स्त्रिया यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. ह्या अभियानामुळे शेवटच्या वंचीत घटकापर्यंत आरोग्य विभाग पोहचला .. 150 उपकेंद्र, 50 प्राथमिक आरोग्य केंद्र, 14 ग्रामीण रुग्णालय आणि दोन उप जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या माध्यमातून हे अभियान राबविण्यात आले. राष्ट्रीय बालस्वासथ्याच्या 30 पथकांच्या माध्यमातून तपासणी घेण्यात आली.त्यातून जिल्ह्यातील 3958 एवढ्या संशयित गर्भाशय मुख कर्करोगाच्या रुग्णांची तर 825 एवढ्या संशयित स्तन कर्करोग रुग्णांची संख्या कळली.त्यामुळे त्यांच्यावर पुढील उपचार करता आल्याची महत्वपूर्ण माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वडगावे यांनी दिली.

शासनाची एस.टी.बससाठीची महिला सन्मान योजना सुसाट

महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी सवलत योजना सुरु केल्यापासून महिलांची प्रवासाची पहिली पसंती एस.टी. झाली असून.. त्यामुळे महिला प्रवासाची संख्या कमालीची वाढली आहे. लातूर विभागात महिला सन्मान योजना, अमृत योजनामुळे आणि लग्नसराईमुळे सर्व खर्च वजा जाता 2 कोटी 82 लाख रुपयाचा नफा झाल्याची माहिती विभागीय वाहतूक निरीक्षक अभय देशमुख यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेस मध्ये 17 मार्चच्या मध्यरात्री पासून महिलांना एकूण तिकिटात 50 टक्के सवलत देण्याची शासनाची महिला सन्मान योजना सुरु करण्यात आली. त्याला लातूर विभागात अत्यंत चांगला प्रतिसाद दिसून येत आहे. लातूर विभागात 17 मार्च पासून मे महिना अखेर पर्यंत 37,94,338 एवढ्या महिला प्रवाशांनी या योजनेचा लाभ घेतला. या सवलती पोटी जी शासनाकडून एस टी ला मिळणारी प्रतिपूर्ती रक्कम आहे रुपये 11,094,5361 कोटी एवढी रक्कम मिळाली आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या प्रातिनिधिक प्रतिक्रिया घेतल्या…

पोलीस क्वार्टर, बाभळगाव येथे राहणाऱ्या श्वेता सावंत म्हणाल्या, लालपरीची ही महिलासांठी शासनाने चांगली योजना आणली असून अर्धे तिकीट झाल्यामुळे महिलांचा फायदा झाला आहे आणि मी खुप आभारी आहे. तसेच सदरची सवलत कायम रहावी.

लालपरीमुळे स्त्रीयांसाठी चांगली सुविधा झाली आहे. आम्हाला एस. टी. प्रवास सेफ आणि आरामदायी वाटतो अशा प्रतिक्रिया अमिता पैठणकर या महिला प्रवाशांनी दिल्या. अनुजा बोडखे यांनी म्हटले, आम्हाला एस. टी. चा प्रवासच सेफ वाटतो, ही सुविधा दिल्यामुळे खूपच उत्तम झाले. तर प्रतिभा पाटील या महिलेने सांगितले, की एस. टी. महामंडळाच्या बसचे तिकीट महिलांसाठी अर्धे तिकिट झाल्यामुळे आम्हाला आमच्या नातेवाईकांना भेटण्याची सोय झाली त्यामुळे एस. टी. महामंडळाचे आभार. अशा बोलक्या प्रतिक्रियातून महिलांच्या प्रवासाची संख्या वाढते आहे. त्यांना शिक्षण, व्यवसाय करण्यासाठीही ही सुविधा अत्यंत उपयोगाची ठरत आहे.

महिलांसाठी या सर्व योजना अत्यंत दुरगामी परिणाम करणाऱ्या ठरत आहेत. महिलांच्या आरोग्यापासून ते त्यांच्या सवलतीच्या प्रवासापर्यंतचा विचार केला तर… उत्तम आरोग्य लाभले तर त्या अधिक सशक्तपणे काम करू शकतात… माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानात शेकडो स्त्रियांच्या कॅन्सरचे निदान लवकर झाल्यामुळे त्यांना नवे जीवन मिळाले आहे… अनेक ग्रामीण महिला  आज जाऊ उद्या जाऊ.. म्हणून अंगावर काढतात त्यातून रोग बळावतो आणि कुटुंबावर प्रचंड मोठ्या खर्चाचा बोजा पडतो.. ह्या अभियानात आरोग्य कर्मचारी घरोघरी गेले आणि त्यातून या महिलांची तपासणी झाली. शासनाचे हे अभियान म्हणजे महिलांना आरोग्याकडे नव्या दृष्टीने पाहण्याची सवय लावणारे ठरले आहे. अशी जिल्ह्यातील या शिबिरात आलेल्या महिलांची भावना होती. या शासनाने महिलांच्या ज्या विविध योजना आणल्या त्यातून त्यांचे शिक्षण, आर्थिक उन्नती आणि आम्ही समर्थ आहोत हा आत्मविश्वास पेरण्यात यशस्वी झाल्या आहेत. शेवटी कल्याणकारी राज्यात ह्याच गोष्टी अभिप्रेत असतात… सर्वांना समान विकासाच्या संधी निर्माण करून देणे, त्यांना सक्षम करण्यासाठी आधार देण.. तेच काम शासन करत असल्यामुळे ” सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय” हे ब्रीद खरे ठरते आहे.

 

युवराज पाटील,   जिल्हा माहिती अधिकारी, लातूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *