• Mon. Jun 30th, 2025

मणिपूर हिंसाचारावर पंतप्रधान मोदींचे मौन का? राज ठाकरेंचा थेट सवाल

Byjantaadmin

Jul 2, 2023

ईशान्य भारतातील एक राज्य धुमसत असताना पंतप्रधानांनी मौन का बाळगलं आहे, हे माझ्यासाठी अनाकलनीय आहे, असं राज ठाकरेंनी पत्रात म्हटलं आहे.

मणिपूर मागील जवळपास दोन महिन्यांपासून हिंसाचाराच्या आगीत धुमसत आहे. या राज्यातील हिंसाचार थांबण्याचे नाव घेत नाही. या हिंसाचारात आतापर्यंत १०० हून अधिक लोकांचा बळी गेला आहे. इतकं होऊनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अद्यापही यावर प्रतिक्रिया दिली नाही. मोदींचे या प्रकरणावर मौन का? असा प्रश्नप्रश्न विरोधी पक्षांकडून विचारला जातअसताना आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही एका जाहीर पत्राद्वारे हाच सवाल पंतप्रधान मोदींना केला आहे.

राज ठाकरे म्हणाले की, वेळीच मणिपूर शांत करून तिथल्या दुखावलेल्या लोकांच्या मनांवर फुंकर नाही घातली तर मणिपूरच नाही तर ईशान्य भारतात, देशापासून विभक्त होण्याचा विचार जोर पकडेल आणि त्याला सरकार जबाबदार असेल. त्यामुळेमाझी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना विनंती आहे की, ठोस पावलं उचला, मणिपूर पूर्ववत होईल हे पाहा, असे राज यांनी म्हटले आहे.

ईशान्य भारतातील मणिपूर हे राज्य शब्दशः असंतोषाने धुमसतंय. केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या एका मंत्र्याच्या घरावरच लोकांनी संतापाने हल्ला चढवला इथपर्यंत परिस्थिती रसातळाला गेली आहे. हे सगळं गेले २ महिने सुरु आहे आणि तरीही परिस्थिती आटोक्यात आणण्यात केंद्र सरकारला अपयश का येतंय हे कळत नाही. पंतप्रधान मोदी ईशान्य भारताकडे काँग्रेसने साफ दुर्लक्ष केलं म्हणून दूषणं द्यायचे पण आज त्यांच्याच कार्यकाळात ईशान्य भारतातील एक राज्य धुमसत असताना पंतप्रधानांनी मौन का बाळगलं आहे, हे माझ्यासाठी अनाकलनीय आहे, असेहीराज ठाकरेंनी नमूद केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *