सलेम: विरोधकांवर दबाव आणण्यासाठी सक्तवसुली संचलनालयाचा वापर होत असल्याची टीका होत असते. त्यामुळे ईडीच्या कारवाया वादाचा विषय ठरतात. तमिळनाडूच्या सलेममधील २ दलित शेतकऱ्यांना ईडीनं नोटिस पाठवली आहे. दोन्ही शेतकऱ्यांचा स्थानिक भाजप नेत्यासोबत कायदेशीर वाद सुरू आहे. विशेष म्हणजे ईडीनं पाठवलेल्या नोटिशीत शेतकऱ्यांच्या जातीचा उल्लेख आहे. राज्य सरकारनं या प्रकरणात तातडीनं हस्तक्षेप करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
सलेमच्या अत्तूरमधील रामनायकेनपलयम परिसरातील करमानी थिट्टूमध्ये एस. कन्नियन (७२) आणि त्यांचे भाऊ एस. कृष्णन (६५) यांची ६.५ एकर जमीन आहे. २०२० मध्ये भाजपचे सलेम पूर्वचे जिल्हा सचिव जी. गुणसेकर यांनी शेतकरी बंधूंविरोधात खटला दाखल केला. शेतकरी भावंडांनी १९९१ आपली आई लक्ष्मीसोबत एक करार केला होता. आपली शेती अमर्यादित काळासाठी कसण्यासाठी देत असल्याचं करारात नमूद करण्यात आलं होतं, असा गुणसेकर यांचा दावा आहे. शेतकरी भावांनी हा दावा फेटाळून लावला. हे प्रकरण अत्तूर न्यायालयात प्रलंबित आहे.२६ जून २०२३ रोडी कन्नियन आणि कृष्णन यांना ईडीनं नोटिस पाठवली. विशेष म्हणजे या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात केवळ ४५० रुपये आहेत. पीएमएलएच्या अंतर्गत चौकशीसाठी ५ जुलैला हजर राहण्याचे आदेश त्यांना देण्यात आले. गुणसेकर यांना जमीन द्यावी यासाठी ईडी समन्स बजावून दबाव टाकत असल्याचा आरोप शेतकरी भावांनी केला. ‘गुणसेकर केवळ एक माध्यम आहेत. शेतकरी भावंडांच्या शेतजमिनीच्या परिसरात ६०० एकर जमीन आहे. हा परिसर डोंगराळ आहे. काही धनाढ्य लोकांना तो हवा आहे,’ असं शेतकऱ्यांच्या वकील जी. प्रविणा यांनी सांगितलं.कन्नियन आणि कृष्णन यांची जमीन घेतल्याशिवाय ६०० एकर जमीन मिळवता येत नसल्यानं गुणसेकर शेतकरी भावंडांच्या मागे हात धुवून लागले आहेत. आधी त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. पण त्याला त्यांनी दाद दिली नाही. म्हणून त्यांना घाबरवण्यासाठी ईडीची नोटिस पाठवण्यात आली. या सगळ्यात एका राजकीय पक्षाचा सहभाग असल्याचा संशय वाटतो, असं प्रविणा म्हणाल्या.
ईडीच्या समन्समध्ये खटल्याशी संबंधित कोणतीही माहिती नाही. शेतकरी बंधू ५ जुलैलाल चौकशीसाठी हजर राहिले. तेव्हा ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्यासोबत उपस्थित राहण्याची परवानगी वकिलांना नाकारली. या प्रकरणाचा तपास पारदर्शकपणे केला जात नाहीए, असा दावा प्रविणा यांनी केला. चौकशी संपल्यानंतर शेतकऱ्यांनी प्रविणा यांच्या माध्यमातून डीजीपींकडे तक्रार नोंदवली. ३१ डिसेंबरला नुनगाम्बक्कम पोलिसांनी प्रविणा यांना चौकशीसाठी बोलावलं. पोलीस अतिशय उद्धटपणे वागल्याचा आणि त्यांना रात्री उशिरापर्यंत चौकशी केल्याचा आरोप प्रविणा यांनी केला.मी आरोपी असल्याप्रमाणे त्यांनी माझी चौकशी केली. मला एखाद्या गुन्हेगारासारखं वागवण्यात आलं. माझ्या आसपास ३० महिला पोलीस होत्या. पोलिसांच्या वर्तनाबद्दल मी डीजीपींकडे तक्रार नोंदवायला गेले. डीजीपींच्या कार्यालयात बराच वेळ प्रतीक्षा केली. पण अधिकारीच नसल्यानं मला तक्रार नोंदवता आली नाही. शेतकऱ्यांना ईडीनं समन्स का पाठवलंय, याचा तपास राज्य सरकारनं करायला हवा, अशी मागणी प्रविणा यांनी केली.मंगळवारी शेतकऱ्यांना सलेम पोलीस अधीक्षकांनी चौकशीसाठी बोलावलं. ‘ईडीच्या केसमुळे आम्हाला अडचणींचा सामना करावा लागत आहे. समन्समध्ये आमच्या जातीचा उल्लेख आहे. आम्ही याबद्दल ईडीच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली. पण आम्हाला कोणतंही समाधानकारक उत्तर मिळालं नाही. आम्हाला गुणसेकर यांच्याकडून सातत्यानं धमक्या येत आहेत. राज्य सरकारनं या प्रकरणात कारवाई करायला हवी,’ असं एस. कृष्णन म्हणाले. पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केल्यावर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.गुणसेकर यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. ‘शेतकरी आणि माझ्यामध्ये जमिनीवरुन किरकोळ वाद आहे. माझ्याकडे योग्य कागदपत्रं आहेत. त्याचा माझ्या पक्षाशी काहीही संबंध नाही. ईडीच्या समन्सबद्दल मला कल्पना नाही. काही जण खोटी माहिती पसरवत आहेत,’ असं गुणसेकर म्हणाले. सलेमचे पोलीस अधीक्षक ए. के. अरुण काबिलन प्रतिक्रियेसाठी उपलब्ध झाले नाहीत.